उत्तर प्रदेश आणि राजस्थानासह देशाच्या इतर भागात आलेल्या वादळामुळे आतापर्यंत १२९ लोक ठार झाले आहेत. सध्या तरी वादळ ओसरलेले असले तरी आगामी ४८ तास धोक्याचे असून पुन्हा वादळी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील अनेक राज्यात गुरुवारी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. त्यात मरणाऱ्यांची संख्या आता १२९ वर पोहोचली आहे. या वादळात अनेक घरांची पडझड झाली असून शेकडो वृक्ष उन्मळून पडले आहेत. पाऊस आणि वाळूचे वादळ एकत्र आल्याने इमारतींच्या भिंतीही खचल्या. या वादळामुळे राजस्थानच्या भरतपूरमध्येच १९ लोक ठार झाले. या वादळामुळे ५० कोटींचं नुकसान झाल्याचं राजस्थानच्या वीज विभागानं जाहीर केलं आहे.
दरम्यान, वादळ ओसरलं असलं तरी या वादळाचा धोका काही टळलेला नाही. हवामान खात्याने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अॅलर्ट जारी केला असून आगामी ४८ तास सावध राहण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या १० जिल्ह्यांना वादळी पावसाचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
