माणूस थोड्याशा त्रासाला कंटाळून मुक्या प्राण्यांबद्दल किती क्रूर वागू शकतो, याचा धक्कादायक अनुभव नागपुरात आला आहे. शहरातल्या शांतीनगर परिसरात दोघांनी 4 ते 5 भटक्या कुत्र्यांना जाळ्यात अडकवून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करत ठार मारलंय. जीव वाचवण्यासाठी कुत्र्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळ्यात अडकवल्यामुळे त्यांचा तो प्रयत्नही फसला. विशेष म्हणजे कुत्र्यांची निर्घृण हत्या करणारे स्वत: पशुपालक आहेत.
भटक्या कुत्र्यांचा त्यांना त्रास होत होता
ते वराह आणि शेळी पालन करतात. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा त्यांना त्रास होत होता. मात्र याबाबत पालिकेकडे तक्रार करण्याऐवजी त्यांनी थेट या कुत्र्यांची क्रुरपणे हत्या केली.
कुत्र्यांना कच-यात फेकून देण्यात आलं
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. हत्या केल्यानंतर या कुत्र्यांना कच-यात फेकून देण्यात आलं. याप्रकरणाची महापालिका आणि पोलिसांनी अजून दखलही घेतलेली नाही.
