अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुलीची हत्या

खारघरमध्ये रहाणाऱ्या संतोषीदेवी सयानी या महिलेने १६ वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुलीचे तिच्या वडिलांसोबत अनैतिक संबध असल्याचा संतोषीदेवी हिला संशय होता. त्यामुळे तिने मुलीची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खारघर पोलिसांनी संतोषीदेवीला बुधवारी अटक केली.

या घटनेतील मृत मुलगी ही आई-वडील व लहान भावासह खारघर सेक्टर २९मध्ये रहाण्यास होती. दहावीत असलेल्या या मुलीचे वडिलांसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय तिच्या आईला होता. यावरून ती नेहमी मुलीला त्रास देऊन मारहाण करत असे. सहा महिन्यांपासून ही आई मुलीचा छळ करत होती. ही बाब त्या मुलीने वर्गमैत्रिणीला सांगितली होती. या छळाला कंटाळून काही दिवसांपूर्वी तिने इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी सुरक्षा रक्षकाकडे दिली होती. मात्र सुरक्षारक्षकाने ही चिठ्ठी त्या मुलीच्या वडिलांऐवजी तिच्या लहान भावाकडे दिली आणि ती संतोषीदेवीच्या हातात पडल्यामुळे त्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता.

संबंधित मुलीची दहावीची परीक्षा सुरू असतानाच ४ मार्च रोजी संतोषीदेवी हिने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याची आवई उठवून आईने पोलिसांचीही दिशाभूल केली. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान, त्या मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केल्यानंतर तिने तिची आई तिचा सतत छळ करत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आईवर संशय बळावल्याने पोलिसांनी संतोषीदेवी हिला ताब्यात घेऊन तिची अधिक चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *