रेल रोको’ आंदोलन मागे, साडेतीन तासांनंतर मुंबईच्या जिवात जीव!


मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती. तब्बल साडेतीन तासांनंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.  रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती. सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या होत्या. आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.
रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांनी लाठीचार्च केल्यानं विद्यार्थ्यांनी लोकलवर दगडफेकही केली होती.

या आहेत प्रशिक्षणार्थींच्या मागण्या?

  • रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
  • रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
  • यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये

अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल रोको घेतला होता.  महत्त्वाचं म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *