भूताच्या भीतीने या गावात होळीला मज्जाव!

संपूर्ण देशभरात होळी उत्सवाची धामधूम सुरू असताना झारखंडमधील एक गाव असं आहे, जिथं होळीच्या सणाला अक्षरशः शुकशुकाट असतो. होळी साजरी केली तर गावात महामारीसारखा आजार पसरेल आणि गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळेल, या भीतीच्या सावटाखाली हे गाव वावरतंय. एका विचित्र अंधश्रद्धेनं ग्रासलेलं हे गाव आहे, झारखंड राज्यातील बोकारो येथील कसमार ब्लॉक स्थित दुर्गापूर! ऐकून आश्चर्य वाटेल, पण दुर्गापूरवासियांनी गेली १०० वर्षं गावात होळीच साजरी केलेली नाही.

खांजो नदीजवळील साधारण ९ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक एकेकाळी इथला जो राजा होता त्याच्या आदेशाचे आजही काटेकोरपणे पालन करत आहेत. राजाने गावात होळी साजरी करू नये असे आदेश त्याकाळी दिले होते. राजाच्या आदेशाचे पालन केले नाही तर राजाचे भूत गावावर संकट उभे करेल, अशी भीती दुर्गापूरवासियांच्या मनात आजही घर करून आहे. त्यांच्या मनातील भीतीला खतपाणी घालणारी आख्यायिका अशी की, ‘साधारण एक दशकापूर्वी दुर्गापूर गावात राजा दुर्गाप्रसाद यांचे राज्य होते. त्यांना होळी सण विशेष आवडायचा. मात्र एका वर्षी होळीच्या दिवशीच राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्या ज्या वर्षी गावात होळी साजरी केली गेली, त्या त्या वर्षी कधी दुष्काळ तर कधी महामारीचे संकट गावावर ओढावले. त्यात अनेक गावकऱ्यांचा मृत्यूही व्हायचा.’

कालांतराने दुर्गापूरवासियांनी होळी साजरी करणंच बंद केल्याचं गावातील माजी सरपंच अमरेश कुमार महतो सांगतात. ते म्हणतात, “या गावातील लोकांनी कधीच होळी साजरी करू नये, असा आदेशच आपल्या मृत्यूपूर्वी राजाने दिला होता. योगायोगाने राजाचा मृत्यू एका युद्धात झाला, तोही होळीच्याच दिवशी. १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ उलटला, पण आजही राजाच्या आदेशाचे पालन आम्ही करत आहोत.”

काही वर्षांपूर्वी दुर्गापूरमध्ये काही मच्छिमार आले होते. त्यांनी परंपरा तोडून गावात होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर गावात महामारी पसरल्याचं गावच्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र वेळेनुसार गावातील लोक बदलत असून ज्यांना होळी साजरी करावीशी वाटते ते दुर्गापूरच्या बाहेर जाऊन होळी साजरी करू लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *