बालमैत्रिणींनी घेतले प्रेमासाठी विष; एकीचा मृत्यू

एका तरुणावरील स्वत:चे प्रेम सिद्ध करण्यासाठी दोन बालमैत्रिणींनी विषाची परीक्षा घेत चॉकलेटमधून उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्यात एकीने जीव गमावला. दोघीही अल्पवयीन आहेत. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी, अशी ही घटना करवीर तालुक्यात घडली आहे.
संज्ञा आणि अर्पिता (नावे बदलली आहेत) या दोघी बालमैत्रिणी. गावातील एका तरुणावर त्यांचे प्रेम जडले. प्रेमाच्या या त्रिकोनामुळे दोघींमध्ये ईर्षा, स्पर्धा आणि आसुया निर्माण झाली. स्वत:चे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्या दोघींनी स्वत:च्या हातावर तरुणाचे नावही गोंदवून घेतली.
प्रेमांध झालेल्या या अल्पवयीन मुलींनी त्या तरुणावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी शेवटी विषाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विष घेऊनही जी जगेल तिचे प्रेम खरे आणि तिचाच तो तरुण, असे ठरले. त्यानुसार चॉकलेटमधून दोघींनी एकाचवेळी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्रास होऊ लागल्यानंतर घरच्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. संज्ञा ही युवती उपचार सुरू असतानाच गुरुवारी मरण पावली.
>मालिका पाहून कल्पना?
सध्या एका मराठी दूरचित्रवाहिनीवर ‘दुहेरी’ नावाची एक मालिका सुरू आहे. या मालिकेत एकसारख्या दिसणाºया दोन तरुणी एकाच तरुणावर प्रेम करताना दाखविल्या आहेत.
याच मालिकेत या दोघींनीही आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी विष प्यायल्याचा एक प्रसंग आहे. त्या प्रसंगातूनच या युवतींना ही अशी जीवघेणी कल्पना सुचली की काय ते कळायला मार्ग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *