आईकडून एक वर्षाच्या मुलाची हत्या

लग्नात अडसर ठरणाऱ्या १४ महिन्यांच्या मुलाची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. पोलिसांनी मुलाची आई, तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली असून भिवंडी न्यायालयाने आरोपींना ८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

भिवंडीतील गुंदवलीमध्ये राहणारा बिरेंद्र यादव याचा २०१५ मध्ये ममता हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना नंतर आर्यन हा मुलगा झाला. मात्र पत्नीची तब्येत ठीक नसल्याने त्याने तिला उत्तरप्रदेशातील आपल्या गावी नेले. पत्नीची तब्येत सुधारल्यानंतर पत्नी, मुलाला घेऊन बिरेंद्र पुन्हा भिवंडीत आला. स्वत:ची खोली नसल्याने राकेश पटेल याच्या खोलीवर तो कुटुंबासह राहू लागला. मात्र राकेश आणि ममता यांचे वागणे संशयास्पद वाटल्याने बिरेंद्रने पत्नीला पुन्हा गावी सोडून भिवंडीत आला. दरम्यान, राकेश हा गावी जाऊन ममताला आपल्या घरी घेऊन आला.

३० जानेवारीला बिरेंद्र कामावरून घरी आल्यानंतर त्याला मुलगा आर्यन याचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर तो तात्काळ राकेशच्या घरी गेला. तिथे रडत असलेल्या ममताला मुलाबाबत विचारले असता, राकेश आणि अजितकुमार (छोटू) हे दोघे मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेल्याचे तिने सांगितले. मुलाच्या मृत्यूबाबत संशय आल्याने बिरेंद्रने पोलिसांना माहिती दिली. मुलाचा मृतदेह गुंदवली गावाच्या परिसरात पुरला होता. पोलिसांनी ही जागा शोधून काढत मुलाचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम केले. आर्यन (१४ महिने) याचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली.

ममता आणि राकेश पटेल यांच्या लग्नात आर्यन याचा अडसर ठरत होता. त्यामुळे आपापसात संगनमत करून आर्यनचा गळा दाबून खून करण्यात आला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला, अशी तक्रार बिरेंद्र यांनी केल्यानंतर ममता (२५), राकेश (३०) आणि अजितकुमार पासवान (१९) यांच्याविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *