तारापूर किल्ल्यात रिसॉर्ट?

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटन क्षेत्र असलेल्या तारापूर किल्ला आणि किल्ल्याची काही जागा कुळ कायद्याने एका व्यक्तीच्या नावे झाल्यानंतर येथे रिसॉर्ट सुरू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पालघर जिल्ह्यात लहानमोठे अनेक पुरातन किल्ले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तारापूर येथील समुद्रालगत असलेला तारापूर किल्ला. त्याचा बंदर म्हणून वापर केला जात होता. पोर्तुगीज काळात या किल्ल्याचा व्यापारासाठी मोठा फायदा होत होता. समुद्रालगत किल्ला असल्याने याच किल्ल्यातून सागवान लाकुड, तांदूळ यांचा गलबतांमार्फत समुद्री व्यापार केला जात असे. तारापूर येथील व्यापारामुळे या ठिकाणी अनेक गुजराती, मारवाडी, मुसलमान व्यापारी आर्थिक उलाढालीसाठी येत असत. काही कालावधीनंतर ते याच ठिकाणी वास्तव्य करून राहिले, त्यामुळे आजही येथे तारापूर गावात अनेक पुरातन वास्तू आहेत. साडेसहा एकर जमिनीवर असलेल्या या किल्ल्यापैकी साडेपाच एकर जागेवर चोरघे यांचे कुळ लागल्याने चोरघे यांनी या किल्ल्यात रिसोर्ट सुरू केले आहे.

रिसॉर्ट सुरू करताना तीन महिन्यांपूर्वी चोरघे यांनी या किल्ल्याची अनेक ठिकाणी मोडतोड केली. त्यामुळे येथील अनेक पुरातन वस्तू नामशेष झाल्याचा आरोप तारापूरमधील ग्रामस्थांनी केला आहे. तर, येणाऱ्या पिढीला इतिहास कळावा म्हणून हा किल्ला महत्त्वाचा असल्याने येथील रिसॉर्ट बंद करून किल्ला पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ वारंवार करत आहेत. एका बाजूला इतिहास जिवंत रहावा म्हणून स्मारक बांधली जात असली तरी दुसऱ्या बाजूला इतिहासातील गड किल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावर खासगी मालक कब्जा करताना दिसतात. यावर सरकारने तातडीने निर्णय घेऊन किल्ला खुला करावा नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात मालक चोरघे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

किल्ल्यामध्ये कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या संदर्भात मालकाला नोटीस बजावली गेली असून त्यावर योग्य ती करवाई केली जाईल.

महेश सागर, तहसीलदार, पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *