ठाणे जिल्ह्यात म्हाडाची पाच हजार घरे

मुंबईचा वाढता विस्तार लक्षात घेऊन म्हाडाने ठाणे जिल्ह्यात गृहप्रकल्पांची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्याअंतर्गत पुढील तीन वर्षांत विरार, ठाणे, मीरा रोड आणि कोकणातील वेंगुर्ला येथे तब्बल ५ हजार ७६३ घरांची योजना आखली आहे. सध्या हे सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यातील विरारच्या बोळिंजमधील ३ हजार ८०० घरांचा प्रकल्प येत्या मार्च महिन्यात पूर्ण होईल. विरारच्या या घरांची लॉटरी यंदाच्या मे महिन्यात काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाने विरारमधील बोळिंजमध्ये दहा हजार घरांचा प्रकल्प आखला आहेत. त्यातील पहिल्या दोन टप्प्यातील सुमारे साडेपाच हजार घरे बांधून तयार आहेत. या घरांच्या लॉटरी विजेत्यांनी घराचे संपूर्ण पैसे भरल्यावर ही घरे ताब्यात देण्यात येतील. तर तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ३ हजार ८०० घरे बांधण्याचे काम पुढील दोन महिन्यात पूर्ण होईल.

कोकण मंडळाची स्वतंत्र लॉटरी

कोकण मंडळाच्या घरांची स्वतंत्र लॉटरी काढण्यात येईल. कारण म्हाडाच्या मुंबईतील घरांना मागणी आहे. मुंबईतील घरांची व विरारमधील घरांची लॉटरीची जाहिरात एकाच वेळेस प्रसिद्ध केल्यास विरारमधील घरांना कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यात चौदाशे घरे

ठाण्याचा झपाट्याने झालेला विस्तार लक्षात घेऊन ठाण्यात १ हजार ४९२ घरांचा प्रकल्प तयार होत आहे. यामध्ये स्वीस चॅलेंज पद्धत राबवली आहे. म्हणजे म्हाडाच्या जागेवर खासगी विकासकाच्या माध्यमातून या योजनेत घरे बांधण्यात येत आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होता. जो विकासक म्हाडाला जास्त घरे देईल, त्याला कंत्राट देण्याची योजना होती. या योजनेत एका विकासकाने चौदाशेपेक्षा अधिक घरे देण्याची तयार दाखवली. या प्रकल्पात ठाण्यात मानपाडा येथे ११०० घरे आणि बाळकुम येथे ३९२ घरे तयार होणार आहेत. बाळकुम येथे दोन गृहनिर्माण प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पांत प्रत्येकी १९६ घरे तयार होतील. त्यातील एका प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम मार्च २०१९मध्ये, तर दुसऱ्या प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम मार्च २०२०पर्यंत पूर्ण होईल. त्याशिवाय मिरा रोड येथे प्रत्येकी १८० घरांचे दोन गृहनिर्माण प्रकल्प तयार होत आहेत. दोन प्रकल्पातील ही २६० घरे मार्च २०२०पर्यंत पूर्ण होतील.

..

वेंगुर्ला येथे पहिलीच उंच इमारत

वेंगुर्ला येथे सात मजली इमारतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातून १११ घरे मिळतील. सात मजली इमारतींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

कुठे किती घरे?

-विरार बोळिंजमध्ये ३ हजार ८०० घरे

-ठाणे मानपाडा ११०० घरे

-ठाणे बाळकुम ३९२ घरे

-मीरा रोड ३६० घरे

..

ही सर्व घरे अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटातील लॉटरीसाठी बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे ठाणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होतील.

– विजय लहाने, मुख्य अधिकारी कोकण गृहनिर्माण मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *