‘मोदींनी नोकऱ्यांचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं’

केंद्रात भाजपचं सरकार आल्यास तरूणांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच दिलं नव्हतं, त्यांनी तर रोजगार देऊ असं म्हटलं होतं, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केलंय, शुक्ला यांच्या या वक्तव्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

देशातील महागाई आणि विकास दर ही समस्या केवळ भारताची नसून ती जगभरात सुरू आहे. मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक सभेत दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देऊ असं म्हणायचे, त्यांनी कधीच नोकरी देऊ असं म्हटलं नाही, असा दावा शुक्ला यांनी केला. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी असं व्हायला नको, तर रोजगार असायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुद्रा योजनांमधून १० कोटीहून अधिक लोकांना कर्ज देऊन रोजगार देण्याचं खरं काम केलंय, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असंही शुक्ला म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्टर्ट अप योजनेचा देशाला फायदा होतोय. आमच्या सरकारने ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज कोणत्याही गॅरंटीविना देण्याचं काम केलं आहे. गावातील महिलांना छोट्या-छोट्या उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्यानं ५०० ते ६०० रुपये रोज कमावतात असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *