अनपेक्षित धक्का, शोकाकूल कुटुंबीय

गुरुवारी मध्यरात्री कमला मिल कम्पाऊंडमधल्या रेस्टोपबमध्ये आग लागल्याचे वृत्त समजल्यानंतर इथे आलेल्यांच्या कुटुंबीयांना चिंतेने ग्रासले. या आगीत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुःखद बातमी शुक्रवारी पहाटे तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांच्या मोबाइलवर धडकली. हा अनपेक्षित धक्का पचवण्याचे बळ मृतांच्या नातलगांमध्ये नव्हते.

या आगीतील मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या सर्वांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी केईएममध्ये गर्दी केली होती. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला गेलेली खुशबू, किंजल शहा, सत्तर वर्षाच्या प्रमिला केणी, त्यांना वाचवण्यासाठी गेलेले धैर्य व विश्वा लालनी यांचे नातलग धाय मोकलून रडत होते. केईएम रुग्णालयामध्ये सकाळी प्रसारमाध्यमांची गर्दी होण्यापूर्वीच मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम करण्याचे वैद्यकीय सोपस्कार पार पडले होते.

जखमींच्या कुटुंबीयांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन त्यांना ब्रीच कॅन्डी, हिंदुजा, भाटिया, मसिना आदी रुग्णालयांमध्ये हलवले. संसर्ग होऊ नये यासाठी या रुग्णांना विशेष कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. सातव्या मजल्यावर जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी नातलगांनाही सायास करावे लागत होते. त्यांना सहजासहजी वर प्रवेश मिळत नव्हता. चिंताग्रस्त होऊन ते खालीच येरझा‍ऱ्या घालत होते. सुरक्षारक्षकांकडे भेटीसाठी वर सोडण्याची परवानगी मागत होते. हातापायांच्या दुखापतीपेक्षाही आगीचे चटके लागून झालेल्या जखमांनी रुग्ण विव्हळत होते. त्यांच्या वेदना पाहून कुटुंबीयांच्या डोळ्यांनाही धार लागली होती.

सर्वांचा मृत्यू गुदमरून

या दुर्घटनेत सर्वजण भाजून नव्हे तर गुदमरून मृत्युमुखी पडल्याचे केईएममधील डॉक्टरांनी स्पष्ट केले. जाण्यायेण्यासाठी अरुंद जागा असते तिथेच आश्रय घेण्याची चूक केली जाते. इथेही तोच प्रकार घडल्याने लोकांची घुसमट झाली व त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *