पुण्याचा पहेलवान निघाला सायकलवरून दिल्लीला

अखंड महाराष्ट्राचे मराठी मनाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्यापासून ते राजधानी नवी दिल्लीपर्यंत स्वच्छतेचा जागर करण्यासाठी पुण्यातील एक पहेलवान चक्क सायकल प्रवासावर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेचा नारा बुलंद करण्यासाठी हा पहेलवाल रस्त्यात येणारी सात राज्ये पालथी घालणार आहे.

पोपटराव खोपडे असे या पहेलवानाचे नाव. वयाची पन्नाशी गाठलेल्या पोपटरावांना ऐन उमेदीच्या काळात अपंगत्वाने घेरले. टपाल खात्यातून निवृत्त झालेल्या पोपटरावांनी आपल्या उमेदीच्या काळात कुस्तीमध्ये खात्याचे प्रतिनिधित्व करीत मैदान गाजविले. अशाच एका अटीतटीच्या सामन्यात बांबू स्पाइन झाल्याने त्यांचा मणका दुखापतग्रस्त झाला. या अपघातात पाठीचे मणके पिळले जातात. त्यामुळे शरीराचे संतुलन राखणाऱ्या त्यांच्या मज्जातंतूला (स्पाइनल कॉडला) इजा झाली. यात त्यांना अपंगत्व आले. तरीही पोपटराव खचले नाहीत. नियतीने उभ्या केलेल्या या प्रसंगाला ते सामोरे गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम त्यांच्या उर्जेचे केंद्रबिंदू. याच उर्मीतून त्यांनी यापूर्वीही असे धाडस केले आहे. वयाच्या चाळीशीत रायरेश्वर ते पुरंदर अशी ३७० कि. मी. ची घोडदौड करीत त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचेही लक्ष वेधले. बुकने त्यांची दखलही घेतली आहे.

वयाच्या पन्नाशीत आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाचा जागर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रायरेश्वर येथून ३ डिसेंबरला सायकल प्रवास सुरू करीत त्यांनी रोज ४५ कि. मी. अंतर कापत रविवारी नागपूर गाठले. बुधवारी विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ते पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन निघालेले पोपटराव मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि नवी दिल्ली अशा सात राज्यांना स्पर्श करीत २१ जानेवारी २०१८ ला राजधानी नवी दिल्लीत पोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची इच्छा त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *