टँकर गळतीमुळे नागरिकांना रसायनबाधा

टँकरमधील घातक रसायन रस्त्यावर पडल्याने कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनचालकांना आणि नागरिकांना उग्र वासाचा आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास सहन करावा लागला. संध्याकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर अग्निशमन दलाने रस्त्यावर पाणी मारल्यानंतर त्रास कमी झाला.

उल्हासनगरहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका रसायनाने भरलेल्या टँकरला गळती लागल्याने त्या टँकरमधील घातक रसायन उल्हासनगरच्या साईबाबा मंदिर ते अंबरनाथ पोलीस स्टेशनदरम्यान रस्त्यावर पडले होते. सुरुवातीला कुणालाही या प्रकाराची कल्पना आली नाही. मात्र काही वेळेतच रस्त्यावर उग्र वास आणि नागरिकांचे डोळे चुरचुरण्यास सुरुवात झाली. काही नागरिकांनी त्याची कल्पना येताच शेजारीच असलेल्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांनी काही काळातच या रस्त्यावर पाणी मारून रसायनाची घातकता कमी केली.

अवघ्या १५ मिनिटांतच नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्यावर पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेनंतर लागलीच पोलिसांनी त्या टँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

तसेच रस्त्यावर पडलेले रसायन कोणते होते याचाही तपास करीत आहेत.

या टँकरने हे घातक रसायन कोणत्या कंपनीमधून उचलले होते, याचाही  तपास पोलीस करीत आहे. या प्रकारामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अंबरनाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *