शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांचे निधन

शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. शशिकांत ठोसर (७६) यांचे मुंबईतील इस्पितळात कर्करोगावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या ४० निष्ठावंतांपैकी एक अ‍ॅड. ठोसर होते.
सायंकाळी त्यांचे पार्थिव त्यांची कन्या अ‍ॅड. शिल्पा भागवत यांच्या सावरकर रोडवरील घरी अंत्यदर्शनाकरिता आणले गेले. रामनगर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘मातोश्री’वर बाळासाहेबांच्या अ‍ॅण्टीचेंबरमध्ये थेट जाणा-या निवडक शिवसैनिकांपैकी अ‍ॅड. ठोसर हे होते. शिवसेनेत गटातटांचे राजकारण सुरू झाल्यानंतर आणि पक्ष ध्येयधोरणांशी प्रतारणा करत आहे, असे जाणवल्यावर त्यांनी स्वत:हून पक्षकार्य थांबवले. मात्र, ते शेवटपर्यंत बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक म्हणून जगले.
त्यांच्या शिवाई बालकमंदिर, ग्रीन्स इंग्लिश स्कूल या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी कधीही डोनेशन घेऊन प्रवेश दिले नाही. विद्यार्थी घडवण्यासाठी पैसा नाही, तर ज्ञानदानाची तळमळ लागते, असे ते ठणकावून सांगत. या दोन्ही संस्थांचे २० वर्षे ते अध्यक्ष होते. मराठी भाषा लोप पावत असताना भाषेच्या संवर्धनासाठी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा त्यांनी भरवल्या. स्वत: उत्तम कबड्डीपटू असलेल्या ठोसर यांनी मुलांमध्ये खिलाडू वृत्ती वाढीस लागावी, याकरिता त्यांनी शिवाई बालक मॅरेथॉन स्पर्धा अनेक वर्षे भरवली.
डोंबिवली नगर परिषद काळात शिवसेनेचे निवडून आलेले ते पहिले नगरसेवक होते. रा.स्व. संघाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला बळ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. आपला वकिली व्यवसाय सांभाळून त्यांनी अनेक वर्षे अभिनव सहकारी बँक अध्यक्ष व संचालकपदावर सक्षमपणे काम केले. वकील क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. कल्याण बार असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या दिवंगत पत्नी सीमा ठोसर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती होत्या. त्यांच्या पश्चात अ‍ॅड. शिल्पा भागवत, अ‍ॅड. आरती देशपांडे या दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, वक्तशीर, स्पष्टवक्ते, निर्भीड, स्वच्छ-पारदर्शी कारभार, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ते, वाचनवेडे, विद्यार्थी घडवण्याची तळमळ, असे आदर्श व्यक्तिमत्त्व ठोसर यांच्या निधनामुळे हरपल्याची भावना जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. राजकारणात दुर्मीळ होत असलेली साधी राहणी हेच ठोसर यांचे वैशिष्ट्य असल्याचे अनेकांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *