पेंच प्रकल्पातून रबी हंगामासाठी पाणी नाही

पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याने तसेच मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सिंचन प्रकल्पातील पूर्व आरक्षित पाण्याच्या नियोजनामुळे पेंच प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून यावर्षी रबी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. अशी माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे.बी. तुरखेडे यांनी दिली.
तोतलाडोह सिंचन प्रकल्पामध्ये आॅक्टोबर२०१७ अखेर जेमतेम ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी सिंचनाकरिता एक पाळी पाणी देण्यात आलेले आहे. परंतु पूर्व आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन माहे जून २०१८ पर्यंत करणे गरजेचे आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे रबी हंगाम २०१७ मध्ये सिंचनाकरिता पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे कालव्यावरुन यंदा रबी व उन्हाळी हंगाम राबविण्यात येणार नाही. याची सर्व पाणी वापर संस्था व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंंता तुरखेडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *