दिघा येथील अनब्रेको या बंद कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेल्या सुरक्षारक्षकाची अज्ञात व्यक्तीने हत्या करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण पाटील (५५) असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल त्याचा शोध सुरू केला आहे. ही हत्या भंगारचोरांकडून झाली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी या हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील लक्ष्मण पाटील हे ठाण्यातील विटावा भागात राहण्यास असून ते दिघा येथील अनब्रेको या बंद कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. रविवारी रात्री ते या कंपनीमध्ये रात्रपाळीसाठी गेले होते. सकाळी पाटील ८.३० वाजेपर्यंत घरी न परतल्याने त्यांची पत्नी त्यांना बघण्यासाठी कंपनीमध्ये गेली होती. यावेळी पाटील हे कंपनीतील सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये मृतावस्थेत आढळून आले. पत्नीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
