सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी; मंदिर प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय

वणीच्या सप्तश्रृंगी गडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवर बंदी टाकण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना जर गडावर आता बोकडाचा बळी द्यायचा असेल, तर तो यापुढे देता येणार नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या बोकडबळी प्रथेला फाटा देत ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडून स्वागत केलं जातं आहे.

सप्तश्रृंगी गडावर गेल्या वर्षी एका दुर्घटनेमध्ये गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते, त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला असल्याचं समजतं आहे. बोकडबळी प्रथेनंतर मानवंदना देण्याची प्रथा आहे. त्यावेळी हवेत गोळीबार केला जातो. गेल्या वर्षी हवेत केलेल्या गोळीबारात गडावरचे १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे बोकडबळीची ही प्रथा बंद करण्याच निर्णय घेतला गेला.

सप्तश्रृंगी मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिकरित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. पण मंदिर परिसरात बंदी कायम राहील. काही दिवसांपूर्वी तुळजापुरातही मांसाहारी नैवेद्यावर बंदी आणली गेली. पण, नंतर काही तासात मंदिर प्रशासनानं हा निर्णय मागे घेतला. पण, सप्तश्रृंगी मंदिर प्रशासन घेतलेल्या या निर्णयावर ठाम राहणार असल्याची माहिती आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंग देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियोजन बैठक कळवणचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *