आरोग्य विभागाचे ‘भरारी पथक’ पाच महिने पगाराविना !

अतिदुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवेअंतर्गत काम करणाऱ्या भरारी पथकातील १६२ डॉक्टरांना सोयी सुविधा तर दूरच, परंतु या डॉक्टरांना एप्रिलपासून त्यांचे वेतनही देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात तसेच नक्षलग्रस्त भागात हे भरारी पथकाचे डॉक्टर पाडय़ा पाडय़ावर जाऊन रुग्णसेवेचे काम करत असतात. नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूरसारख्या भागात गेली दहा वर्षे हे डॉक्टर अवघ्या २४ हजार रुपये वेतनात हंगामी म्हणून काम करत असून नंदुरबारसह अनेक भागात या डॉक्टरांना स्वच्छतागृहांच्या सुविधाही उपलब्ध नाहीत. अनेक भागात पाच ते दहा किलोमीटर चालल्यानंतर आरोग्य केंद्रांमध्ये पोहोचता येते. यातील अनेक केंद्रे ही एखाद्या झोपडीत नाहीतर शाळेच्या जागेत चालवली जात असून पावसाळ्यात अनेक भागात अनेक दिवस वीज गायब असताना बॅटरीच्या सहाय्याने बाळंतपण करावे लागते असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. या डॉक्टरांना एक गाडी उपलब्ध करून देण्यात येत असली तरी बहुतेक गाडय़ांची अवस्था अत्यंत खराब असून नंदुरबारमधील ४० डॉक्टरांना एकही गाडी देण्यात आली नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. भरारी पथकाच्या या डॉक्टरांना सहा हजार रुपये आदिवासी विभागाकडून देण्यात येतात तर १८ हजार रुपये आरोग्य विभागाच्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’तून देण्यात येतात. नंदुरबारमधील डॉक्टरांना एप्रिलपासून एक फुटकी कवडीही मिळालेली नसून अशा परिस्थितीत काम करायचे कसे व कुटुंब चालवायचे कसे असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केला आहे. नंदुरबार वगळता उर्वरित सर्व डॉक्टरांना आदिवासी विभागाचे सहा हजार रुपये एप्रिपासून देण्यात आले नसून गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षीचे तीन महिन्याचे यांचे वेतनच देण्यास आरोग्य व आदिवासी विभाग विसरला असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *