इंद्रायणी नदीतून ४५ हजार गणपती मूर्ती बाहेर काढल्या, प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम

इंद्रायणी नदीचे जल प्रदूषण रोखले जावे म्हणून भविष्यात अभियंते होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. दीड, सात आणि बारा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी ४५ हजार मूर्ती नदीतून बाहेर काढण्यात आल्या. देवाची आळंदी मध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होते. त्याचमुळे आळंदी मधील ‘एम.आय.टी. आळंदी’ या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘व्हिजनरी फायटर्स’द्वारे जलप्रदूषण मुक्त करण्याचा वसा हाती घेतला आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आणि दीड आणि सात दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी सुमारे ४५ हजार गणेश मूर्ती इंद्रायणी नदीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. तसेच ८ हजार मूर्ती दानही करण्यात आल्या आहेत. मानवी साखळीद्वारे या सगळ्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. या उपक्रमामुळे जल प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. इतकेच नाही तर जलचरांचा जीव वाचण्यासही मदत होणार आहे.

या उपक्रमाचे कौतुक होते आहे, मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. इंद्रायणी नदीतून बाहेर काढण्यात आलेल्या सगळ्या गणेश मूर्ती आळंदी नगरपरिषदेला देण्यात येतात. पुढील वर्षी गणपती जेव्हा घरात विराजमान होईल तेव्हा शाडू मातीचा हा बाप्पा घरी घेऊन जावा असा संदेशही पथनाट्यातून देण्यात येतो. पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही या विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *