जिल्ह्याला गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे तेथिल नद्यांना पूर आले आहेत. पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गगनबावडा-कळे मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावर पाच खाजगी बसेस अडकल्याची माहिती मिळते आहे. रात्री एक वाजल्यापासून या बसेस गगनबावडा-कळे मार्गावर अडकल्या आहेत. या पाच बसेसमध्ये मिळून जवळपास 250 ते 300 प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे. हे सगळे प्रवासी सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. गगनबावडा-कळे मार्गावरून जाणाऱ्या कोल्हापूर ते पुणे या मार्गाच्या त्या बसेस आहेत. काही वेळातच जिल्हा परिषदेची टीम घटनास्थळी दाखल होइल, अशी माहिती मिळते आहे. पावसामुळे 129 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटापर्यंत पोहचली आहे. जर पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 7 इंचाने वाढली तर कोल्हापुरात महापूर येण्याची भीती वर्तविली जाते आहे.
