नवरा नांदवत नाही म्हणून पती, सासू-सासरा आणि अन्य चारजण झोपेत असताना रॉकेल टाकून घर पेटवून दिल्याची घटना तामिळनाडूत घडली आहे. त्यानंतर स्वत: आरोपी महिला पांडीश्वरी (२५) पोलीस ठाण्यात दाखल झाली. ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील कुमारपूरम या गावात घडली.
या घटनेत पती कन्नन (२७), सासू पेच्चम्मल (५०), सासरा वेल्लू (६५), कननची बहिण सुगंधी (३५) आणि तिची मुले संगीता (१७),आणि संगीत (१२) असे जळून मृत्यू झाले. तर विनीत हा १३ वर्षाचा मुलगा गंभीर भाजल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक मनोहरन यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्ननने पांडीश्वरी हिच्याशी तीन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र या दोघांत सतत वाद होऊ लागला. त्यामुळे कन्नन गाव सोडून गेला होता.
अखेर गावक-यांच्या समजवण्यावरून कन्नन आपल्या मुळगावी चेन्नईहून परत येऊन आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. मात्र कन्ननने पांडीश्वरीसोबत रहाण्यास नकार दिला.
त्यामुळे संतापलेल्या पांडीश्वरी हिने मंगळवारी रात्री घरात सासू-सासरे, पती, भाची आणि इतर नातेवाईक झोपलेले असताना घराला बाहेरुन कडी लावून घरावर रॉकेल टाकून पेटवून दिले आणि स्वत: सदापेट्टी पोलीस ठाण्यात हजर झाली.