देशाच्या काही भागात मान्सून सक्रिय असलेला बघायला मिळतो आहे. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याचंही चित्र बघायला मिळतं आहे. देशाच्या काही भागात जेथे मुसळधार पाऊस सुरू आहे तेथेच पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. आसामला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं आहे. पावसामुळे ब्रम्हपुत्रा, बराक या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तेथिल 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीचा फटका आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कलासुद्धा बसला आहे.
आसाममध्ये असलेल्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पाणी शिरलं असून आर्ध्या नॅशनल पार्कमध्ये पाण्याचं साम्राज्य बघायला मिळतं आहे. यामुळे नॅशनल पार्कमधील प्राणी त्यांच्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात आहेत. नॅशनल पार्कमध्ये साचलेल्या पाण्यामुळे तेथिल काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येते आहे. तेथिल परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतं आहे.
संपूर्ण ईशान्य भारतात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मेघालयातील जनजीवन विस्कळीत झालं आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर परिसरात पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. आसाममध्ये साडेतीन लाखांहून अधिक लोक बेघर झाले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे.
