भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ अखेर रवी शास्त्रीच्या गळ्यात पडली आहे. त्याबरोबरच गेल्या महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. रवी शास्त्रीबरोबरच भारताच्या अन्य दोन माजी क्रिकेटपटूंकडे संघव्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी आज रात्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली.
कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंत असल्याने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्रीचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, आज संध्याकाळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड झाल्याचे वृत्त आले होते. पण बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाच्या नावाबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर रात्री बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी रवी शास्त्री याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे घोषित केले. त्याबरोबरच झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षक आणि, राहुल द्रविडची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
अनिल कुंबळेचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले होते. दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार हे निश्चित झाले होते. दरम्यान, कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर अनिल कुंबळेने संघाचे प्रशिक्षकपद तडकाफडकी सोडले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि टॉम मुडी यांच्यासह दहा जणांनी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी पाच जणांच्या मुलाखती काल पार पडल्या होत्या.
