जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी (4 जुलै) आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. 24 तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी काही दहशतवादी याच परिसरात लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे बांदीपोरामधील परिसरातही घेरावबंदी करण्यात आली आहे. येथे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी (1 जुलै) ”लष्कर-ए-तय्यबा”चा कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू होती. या चकमकीदरम्यान दोघांना ठार करण्यात आले. मात्र या चकमकीदरम्यान दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीनुसार, ‘दहशतवादी एका घरात लपून बसले होते. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू असताना गोळ्या लागल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला’, अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले. सुरक्षा जवानांनी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी बशीर लष्करी असल्याची तेव्हा माहिती मिळाली होती. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. 16 जून रोजी ही हत्या करण्यात आली होती.