अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मृत मुलीचं प्रेत हातगाडीवरून नेलं घरी

आपल्या मृत मुलीचं प्रेत घरी नेण्यासाठी हातगाडी भाड्याने घेण्याची वेळ एका कुटुंबावर आली होती. छत्तीसगडमधील राजनंदगावात ही घटना घडली आहे. हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी हॉस्पिटलने वेळेवर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप त्या कुटुंबाने केला आहे. बख्रु टोला या गावात हे कुटुंब राहतं आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. या कुटुंबातील 17 वर्षाच्या मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्या कुटुंबाने तिला जिल्ह्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारा दरम्यान त्या मुलीची मृत्यू झाला त्यानंतर तिचा मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यासाठी हॉस्पिटलने 750 रूपयांची लाच मागितली होती. मुलीच्या कुटुंबियांनी लाच द्यायला नकार दिल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून पुढील इतर गोष्टींमध्ये दिरंगाई करण्यात आली. दुपारी बारा वाजता त्या मुलीचं पोस्टमार्टेम झाल्यानंतर घरी जाण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलकडे अॅम्ब्युलन्सची मागणी केली.  पण त्यांना काही वेळासाठी थांबण्याचं हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
अॅम्ब्युलन्स मिळण्याची दोन तास वाट पाहिल्यानंतर मृतदेह हातगाडीवर घरी नेण्याचं त्या मुलीच्या कुटुंबियांनी ठरवलं. ‘दुपारी पावणे तीन वाजता आम्ही मुलीची गाडी हातगाडीवरून घरी घेऊन जात होतो. गुरूनानक चौकात पोहचल्यानंतर हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली पण आम्ही त्याला नकार दिला, अशी माहिती मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसंच गावातील लोकांकडून पैसे जमा करून मुलीचा मृतदेह बख्रु टोळामध्ये घेऊन जाऊ, असं कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.
मृत मुलीचा मृतदेह अॅम्ब्युलन्स न दिल्याने हातगाडीवरून न्यावं लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात निदर्शन केली.
‘हॉस्पिटलमध्ये असलेल्या दोन्ही अॅम्ब्युलन्स व्यस्त असल्याने आम्ही त्या कुटुंबाला थांबायला सांगितलं होतं. दुपारी 2.45 वाजता मुलीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी लगेचच तो हातगाडीवर नेला. त्यानंतर 3.15 वाजता आम्ही त्यांना गाडी उपलब्ध करून दिली पण त्यांनी त्यासाठी नकार दिला, अशी माहिती जिल्हाधिकारी भिम सिंग यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. दाना मांझी या व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची घटना घडली होती. तसंच ओडिसामध्ये एका पित्याला आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किमी प्रवास करावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *