गाडीत दोन तासांहून जास्त वेळ लॉक झाल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुडगावमध्ये घडली आहे. उन्हाळी सुट्ट्यांसाठी या मुली आपल्या आजी – आजोबांच्या घरी आल्या होत्या. जमालपूर गावातील पतोडी परिसरात त्यांचं आजोळ होतं. या मुलींचे वडिल लष्करात असून मेरठमध्ये त्यांचं पोस्टिंग आहे.
हर्षदा आणि हरिषिता अशी या जुळ्या बहिणींची नावे आहेत. घरामागे असणा-या हुंडाई कारमध्ये दोघीही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना समोर आली. या दोघी नेहमी येथे खेळत असायच्या. दोघींना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
मुलींनी गाडीचा दरवाजा आणि काचा उघडण्यासाठी प्रयत्न केल्याचे निशाण आहेत. परवा या मुली मेरठला आपल्या घरी परतणार होत्या. काही आठवड्यातच त्यांची शाळा सुरु होणार होती.
अपघाताने या मुली कारच्या आतमध्ये लॉक झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. कारचे लॉक खराब झाले असून काचाही खाली येत नाहीत. चार वाजताच्या आसपास मुली जवळ कुठेच दिसत नसल्याचं पाहून सर्वांनी धावाधाव सुरु केली. सर्वात आधी सगळ्यांनी घरामागे पडलेल्या या कारकडे धाव घेतली होती.
‘जेव्हा माझ्या मुली जन्माला आला तेव्हा कुटुंबातील सगळे आनंदी झाले होते. दोघींना मेरठमधील शाळेतही घातलं होतं. दोघी खोडकर आणि अभ्यासू होत्या’, असं सांगताना वडिल गोविंद सिंह यांना भरुन आलं. ‘दोघी एकत्र जन्मल्यानंतर मृत्यूही एकत्रच होईल असा साधा विचारही कोणी करु शकत नव्हतं’, असं आजोबा कनवल सिंग सांगतात.
