भगवान जिद्दीने झाले ५७व्या वर्षी मॅट्रिक

‘आकांक्षेपुढती गगन ठेंगणे’ या उक्तीचा प्रत्यय मंगळवारी घोष‌ित झालेल्या दहावीच्या निकालानंतर वाडी ब्रह्मपुरी या गावात अनुभवण्यास आला. परिस्थितीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या ५७ वर्षीय भगवान काळे यांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत, शिक्षण घेण्यासाठी वयाची कुठलेही बंधन नसल्याचा आदर्शच समाजासमोर ठेवला आहे.

चिखली तालुक्यातील वाडी ब्रह्मपुरी येथील भगवान काळे यांनी वयाच्या ५७व्यावर्षी दहावीची परीक्षा ५९ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किन्होळा येथील श्री शिवाजी हायस्कूल या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत त्यांनी ही परीक्षा दिली. ‘आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलांसोबत बसून परीक्षा देताना अवघडल्यासारखे वाटत होते. परंतु, कुठल्याही परिस्थितीत मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण करायचीच, असा मी ध्यास घेतला होता. निकालानंतर आपल्याला ५९टक्के गुण मिळाल्याचा आनंद आहे’, असे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भगवान काळे यांची वयाच्या ५७व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करण्याची जिद्द तरुणांसमोर आदर्शवत आहे. यापुढे अकरावी व बारावी करीत पदवीधर होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *