बिहारच्या ‘या’ गावात तब्बल ३०० IIT इंजिनीअर

साक्षरतेच्या बाबतीत बिहार नेहमी पिछाडीवर असल्याचं आजवर दिसून आलं असलं, तरी गया जिल्ह्यातील एका गावातल्या तरुणांनी केलेली किमया सर्वांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. पटवा टोली हे गाव सध्या ‘आयआयटी हब’ म्हणून उदयास येत आहे. या गावाने आजवर ३०० आयआयटी इंजिनीअर दिले आहेत.

होय, हे खरं आहे. पटवा टोली या गावातील तरुणांनी इंजिनीअरिंग क्षेत्रात भरारी घेतली आहे. यंदाच्या वर्षात गावातील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी इंजिनीअररिंगमध्ये यश प्राप्त केलं आहे. गेल्या २५ वर्षांत या गावातील ३०० हून अधिक तरुण आयआयटी इंजिनीअर झालेत. याची सुरुवात १९९२ सालापासून झाली होती. जितेंद्र सिंह हा एका विणकराचा मुलगा गावातील पहिला आयआयटी इंजिनीअर ठरला होता. मुंबई आयआयटीत प्रवेश मिळवण्याचं स्वप्न जितेंद्रने जिद्दीनं साकार केलं होतं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इंजिनीअर झालेला जितेंद्र गावासाठी तरुणांचा आदर्श बनला आणि ‘आयआयटी हब’ होण्याच्या दिशेनं गावाचा प्रवास सुरू झाला.

गावातील विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मेहनत करू लागले आणि त्यांना यशही मिळालं. १९९२ सालापासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे. विशेष म्हणजे, आयआयटी इंजिनीअ झाल्यानंतरही विद्यार्थी आपल्या गावाला विसरले नाहीत. गावातील तरुणांनी असंच यश मिळवावं, यासाठी ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह इतर सर्व मदत करतात. ‘एकमेकां साह्य करु..’ या उक्तीप्रमाणे तरुणांनी आज आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *