सर्वजण ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो, मान्सून येत्या 30 मे पर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. त्यामुळे उकाडयाने हैराण झालेल्या विदर्भातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला. वर्ध्यामध्ये मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या तसेच नागपूरमध्येही पाऊस झाला त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही रविवारी संध्याकाळी दमदार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या जनतेला दिलासा दिला असला तरी, काही ठिकाणी रब्बी पिकांचेही नुकसान झाले. राज्याच्या काही भागात पाऊस झालेला असल्यामुळे मुंबईकरही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.
मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केल्याने तो वेगाने पुढे सरकणार असून येत्या २, ३, ४ जून दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. साबळे हे कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख असून गेल्या १५ वर्षांपासून ते शेतीच्या दृष्टीने मान्सूनचा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी मॉडेल तयार केले असून हा अंदाज मार्च, एप्रिल व मे महिन्यातील कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वा-याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे.
त्यासाठी त्यांना डॉ. खासेराव गलांडे आणि अभियंता विलास नजन हे सहाय्य करीत आहेत.डॉ. साबळे यांनी सांगितले की, दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्याचे वितरणही वेगळे असते. त्यादृष्टीने राज्यात विभागवार नेमका किती पाऊस पडेल व खंड कधी असेल, याची माहिती शेतक-यांना मिळणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने तो पिकाचे नियोजन करु शकतो. स्थानिक पातळीवर अंदाज व्यक्त करायचा असेल तर किमान ३० वर्षांचा डाटा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी सरासरी ऐवढा पाऊस पडेल असे म्हटले जाते, तेव्हा तेथे फरक पडू शकतो मध्ये खंड पडू शकतो व पुढच्या काळात कमी दिवसांत अधिक पाऊस पडून तो सरासरीएवढा येऊ शकतो.