बारावी निकालाच्या धास्तीनं सुसाईड नोट लिहून ‘ती’ बेपत्ता

  • बारावीच्या परीक्षेत पास होणार की नाही, या भीतीपोटी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील ही घटना आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी रवींद्र राजपूत ही तरुणी मंगळवारी (23 मे) पहाटे 5  वाजल्यापासून बेपत्ता आहे, शिवानी जुनी सांगवी येथील संगमगर येथील रहिवासी आहे.  गेल्या काही दिवसांपासून पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागेल, अशी अफवा पसरली असल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचीही परिसरात चर्चा आहे.
    ‘मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मला माहीत आहे की मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.’ अशी चिठ्ठी लिहून शिवानी घरातून निघून गेली. याप्रकरणी शिवानीच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची नोंद केली आहे. पण शिवानीबाबतची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.
    दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दहावी, बारावीच्या निकालांच्या तारखांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात होते. पण आता लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. बोर्डाकडून बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून निकालाची तयारी सुरू आहे. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र अद्याप बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली नसल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. निकालाची कागदोपत्री तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बारावीच्या परीक्षेचा निकाल मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, निकालाची वेळ आणि तारीख अजूनही बोर्डाने जाहीर केलेली नाही. लवकरच तारीख जाहीर करण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *