पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने वाळूघाट कंत्रादारास १० लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मनोज मानवटकर याला मुंबई तसेच वर्धा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पुलई गावातून अटक केली.
मनोज मानवटकर हा वर्धा तालुक्यातील पुलई गावचा रहिवासी असून त्याचे मुंबईतील मंत्रालयात सातत्याने जाणे येणे होते. त्याने अमरावती जिल्ह्य़ातील आष्टा वडाळा वाळूघाटाच्या कंत्राटदाराला १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजारांची रक्कम कट रचून स्वीकारण्यात आली होती. त्याबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, मनोज मानवटकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
त्याला अटक करण्याकरिता मलबार हिल पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक अनिकेत सावंत, पीएस नरेंद्र पाटील आणि खरांगणा पोलिसांनी जिल्ह्य़ात येत मनोज मानवटकरचा शोध सुरू केला. चार दिवसांच्या प्रयत्नातून रात्री पुलई येथील राहत्या घरीच मनोज मानवटकर याला पोलिसांनी अटक केली. रविवारी न्यायालयाच्या परवानगीने त्याला मुंबईला नेणार असल्याची माहिती खरांगण्याचे ठाणेदार प्रशांत पांडे यांनी दिली. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहितीसुध्दा पोलिसांना मिळाली आहे.
