वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढपूरच्या विठूरायाचे आता चैत्र आणि माघी एकादशीला २४ तास दर्शन मिळणार आहे. वारक-यांच्या अनेक वर्षाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी २४ तास मंदिर उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. ही आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली आहे.
याआधी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांना २४ तास दर्शन देण्यासाठी खुला असे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातील विविध भागातून भाविक आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या यात्रेसाठी पंढरपुरात येतात.
मात्र चैत्री आणि माघी यात्रेला मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहत नसल्याने लाखो भाविकांना रात्रभर दर्शन रांगेत ताटकळत राहावे लागत असे. चैत्र आणि माघी यात्रेसाठीही विठुरायाचे २४ तास दर्शन खुले व्हावे, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. ही बाब मंदिर समितीच्या निदर्शनास आणल्यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी देत भाविकांच्या अनेक वर्षाच्या मागणीचा मान ठेवला आहे.