१२ वर्षांत तिला मिळाला तीन वेळा तलाक

तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या देशभरात गाजत असतानाच बरेलीतील तारा खान या महिलेला गेल्या १२ वर्षांत तीन वेळा तलाक दिला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताराचं सध्या चौथं लग्न झालं असून पुन्हा घटस्फोट मिळेल की काय, या भीतीनं तिला सध्या ग्रासलं आहे.

३५ वर्षीय तारा खान ही एक अशिक्षित महिला आहे. १२ वर्षांपूर्वी बरेलीतील जाहिद खान या इसमाशी तिचं लग्न झालं. पण सात वर्षानंतरही मूलबाळ न झाल्याने जाहिदनं तिला तलाक दिला आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. घटस्फोटानंतर तारा नातेवाईकांच्या घरी राहू लागली. काही काळाननंतर कुटुंबीयांनी पप्पू खानशी तिचा निकाह लावून दिला. पण तो तिला सतत मारहाण करत असे. त्याच्या छळाला विरोध करताच त्यानंही तिला सोडून दिलं. दुसऱ्या घटस्फोटानंतर ती मामाच्या घरी राहू लागली. संपूर्ण आयुष्य एकटीने जगणं शक्य नाही असे सांगत मामा व त्याच्या मुलांनी ताराची समूजत काढली आणि तिला तिसऱ्या लग्नासाठी तयार केलं. पण तिथंही तिचं दुर्दैव आड आलं. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच सोनू नावाच्या तिच्या नवऱ्यानं तिला सोडलं. तो तिला सतत मारहाण करत असे. एके दिवशी मामाच्या घरात नेऊन त्यांच्यासमोरच त्यानं तिला तलाक दिला.

तीन वेळा या दु:खातून गेलेली तारा पूर्णपणे कोलमडली. पुन्हा लग्नाच्या दुष्टचक्रात अडकण्याची तिची इच्छा नव्हती. पण कुटुंबीयांनी तिची समजूत काढत तिला पुन्हा लग्न करण्यासाठी तयार केले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ताराने शमशाद या इसमाशी लग्न केलं. पूर्वायुष्यातील भयानक अनुभवामुळे तारा खूप घाबरली आहे. आधीप्रमाणेच हे लग्नही अयशस्वी ठरले आणि पतीने सोडले तर आपण रस्त्यावर येऊ, अशी भीती तिला सतत वाटत असते.

तुझ्यामुळंच आम्हाला खूप बदनामी सहन करावी लागली आहे, असं सांगत तिच्या पाचही भावांनी तिला आसरा देण्यास नकार दिला. त्यामुळे हे लग्न टिकवून ठेवणं तारासाठी अत्यावश्यक आहे. सध्या तारा आणि शमशाद यांचे बरेलीत काउन्सिलिंग सुरू आहे. ‘ गरज पडल्यास या मुद्यावरून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत जाईन. मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं आहे. गेल्या १२ वर्षांत मी खूप सहन केलंय, त्यामुळं आता पुन्हा लढण्याची ताकद माझ्यात नाही,’ असं तारानं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *