थंडगार ताडगोळ्यांना वसईकरांची पसंती

एप्रिल महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या वसई-विरारमधील नागरिकांना शरीर आणि मनाला थंडावा देण्याऱ्या ताडगोळ्यांना पसंती दिली असून वाढलेल्या उकाडय़ावर उतारा म्हणून थंड आणि पौष्टिक पदार्थाना मागणी वाढल्याचे चित्र आहे.

शरीराला थंडावा देणाऱ्या फळांमध्ये ताडगोळ्यांचे स्थान महत्त्वाचे असून उकाडा वाढला की वसईच्या ग्रामीण भागात साधारण एप्रिलच्या सुरुवातीला ताडगोळे विक्रेते दृष्टीस पडतात. या फळाची आवक नायगाव, किरवली, अर्नाळा, गिरीज, निर्मळ, कळंब या परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरून होत असून वसईच्या रेंज ऑफिस, गोखिवरे, वसई रोड, पेल्हार, नालासोपारा, वसई गाव, भुईगाव, गिरीज, विरार येथे त्यांची विक्री केली जात आहे. या ताडगोळ्यांसाठी सध्या बाजारात एका डझनला ४० ते ५० रुपयांचा भाव असून त्याचा आस्वाद व उकाडा पाहता ग्राहकांकडून मात्र त्यांची खरेदी केली जात आहे.

ताडगोळे काढण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. झाडावरून काढताना त्यांची विशेष काळजी घेतली जाते. फळाच्या कठीण आवरणात दोन तीन ताडगोळे असतात. त्यांना धक्का न लावता ताडगोळे अलगद काढणे हे कौशल्याचे काम आहे. तसेच फळाच्या आवरणातून बाहेर काढलेला ताडगोळा फारसा टिकत नसल्याने विक्रेते ग्राहकांसमोर त्याची विक्री केली जाते.

उन्हाळ्यात या ताडगोळ्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले राहते. आज चायनीज फ्लेवर टाकून तयार केलेले ज्यूस पिण्यापेक्षा नैसर्गिक तयार होणारी फळे उत्तम असून, यामुळे शरीराची कोणतीच हानी होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *