-
भारतामध्ये चीनची बनावट अंडी विकली जात असल्याच्या बातम्या येत असताना पहिल्यांदाच कोलकातामध्ये बनावट अंडी विकल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अनिता कुमार या महिलेने गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आपल्याला प्लास्टिकची अंडी विकली गेली असल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
अनिता कुमार यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं आहे की, ‘जेव्हा मी अंड्याची पोळी बनवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच ती कृत्रिम असल्याचं माझ्या लक्षात आलं’. अनिता कुमार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत दुकानदार मोहम्मद शामिम अन्सारीला अटक केली आहे.
अनिता कुमार यांनी सांगितलं की, ‘डॉक्टरने माझ्या मुलाला रोज एक अंडं खाण्यासाठी सांगितलं आहे. लोकल मार्केटमधून खूप सारी अंडी मी एकत्र विकत घेते. ही अंडी खाल्ल्यानंतर माझा मुलगा आजारी पडत असल्याचं माझ्या लक्षात आलं. अंड्यांमध्ये नक्कीच काहीतरी खराब आहे अशी मला शंका आली. ही अंडी खाल्ल्याने त्याच्या अंगावर पुरळ उठली होती’.
‘जेव्हा मी अंड्याला बाहेरच्या बाजूने पेटवलं तेव्हा प्लास्टिक जळाल्यासारखा वास आला आणि ते जळू लागलं. यानंतर मी दुस-या दुकानातून अंडी आणून त्यांच्यावरही असाच प्रयोग केला. पण त्या अंड्यांमध्ये अशी काहीच समस्या नाही सापडली. यानंतर मी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली’, अशी माहिती अनिता कुमार यांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या अन्सारीने मात्र ‘आपण होलसेल विक्रेत्याकडून अंडी खरेदी करत असून ती बनावट असू शकत नाहीत’, असा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारीने आंध्रप्रदेशच्या एका मोठ्या व्यापा-याकडून दीड लाख अंडी खरेदी केली आहेत. ‘जर अंडी बनावट असतील तर त्या व्यापा-याने ती चीनमधून खरेदी केल्याची शक्यता असल्याचंही’, अन्सारी बोलला आहे.
आयुक्त अटिन घोष यांनी शुक्रवारी बाजारात जाऊन पाहणी केली. दुकानातून ताब्यात घेण्यात आलेली अंडी आणि अनिता यांच्या घरातील अंड्यांची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत.
गतवर्षी केरळमध्ये चीनी तांदूळ विकले जात असल्याच्या बातम्या होत्या. तपासणी केली असता प्लास्टिकपासून बनवण्यात आलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात बाजारात विकला जात असल्याचं समोर आलं होतं.