चिमुकल्यांच्या दप्तरांचे ओझे हलके होणार?

चिमुकल्यांच्या दप्तरांचे ओझे हलके होणार?

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठी तयार केलेला नवीन अहवाल येत्या चार दिवसांत शालेय शिक्षण विभाग राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

चिमुकल्यांच्या दप्तरांचे वजन प्रचंड वाढल्यामुळे त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होत आहे. ही बाब शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये जाणवली. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन पाच किलोपर्यंत दिसून आले. त्यामुळे दप्तरांचे वजन हलके न झाल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडे सादर करण्यात येणाऱ्या नवीन अहवालात नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दप्तरांचे वजन कमी करण्यासाठी आठ जणांची समिती अलीकडेच स्थापन करण्यात आली होती. समितीने विभागीय स्तरावर मुख्याध्यापक, पालकांसोबत चर्चा करून अहवाल तयार केला. त्यासंदर्भात समितीने शालेय शिक्षण विभागाकडे अहवालही सादर केला. यात ४४ शिफारशी करण्यात आल्या होत्या. पण दप्तरांच्या वजनाचा स्पष्ट उल्लेख केला नव्हता. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातील सनदी अधिकारयांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर नवीन अहवाल तयार करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीला दिल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नवीन अहवाल तयार करण्यात आला आहे. आता हा अहवाल राज्य सरकारकडे पुन्हा पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील बाबींचा उलगडा होण्यास मदत होईल.

 विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, क्रीडा साहित्य, जास्त पुस्तके शाळेत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही, असा उल्लेख नवीन अहवालात होण्याची शक्यता आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अनावश्यक पुस्तके दप्तरात आणली होती. यानंतर वेळापत्रक तयार करण्यात येणार असून कमी पुस्तके दप्तरात ठेवावी, या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेला काटेकोर सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दप्तरांचे ओझे हा गंभीर विषय आहे. त्यामुळे यावर नव्याने अहवाल तयार करण्यात येत आहे. अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या चार दिवसांत राज्य सरकारकडे हा अहवाल देण्यात येईल. त्यानंतरच तातडीने याची अंमलबजावणीसाठी बैठक होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *