मद्यसम्राट विजय मल्ल्या हा ९ हजार कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून पलायन करून लंडनमध्ये तळ ठोकून बसला आहे. पण बिहारमध्ये मात्र डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या १० वर्षांच्या एका बालकाला त्याच्या पालकांनी ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या २५ हजारांच्या कर्जासाठी बँकेने कोर्टात खेचले आहे. त्या मुलाचे नाव धर्मराज पासवान असे असून बेगुसराई येथील कोर्टात त्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती.
धर्मराज याच्या आई-वडिलांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झालेले आहे. त्याचा सांभाळ बाथोल गावातील रहिवासीच करतात. धर्मराज याचे वडील शंकर पासवान यांनी १९८७ सालात बिहार ग्रामीण बँकेकडून २५ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांचे आणि पत्नीचे निधन झाल्याने ते कर्ज थकीत राहिले आहे. त्यापोटी बिहार ग्रामीण बँकेने १० वर्षांच्या धर्मराजवर ८५ हजार रुपये भरण्यासाठी नोटीस बजावली आहे.
‘लोक अदालत’मधील वकिलाने २५ हजार रुपयांत हे कर्ज प्रकरण मिटवून टाकण्याचा प्रस्ताव दिलाय, असे धर्मराज याने सांगितले. पण आज तर त्याच्या खिशात गावकऱ्यांनी दिलेले केवळ ७०० रुपयेच होते. पुढे काय होणार या निराधार बालकाच्या शिरावरील कर्जाच्या डोंगराचे, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.