‘कुरुप’ मुलींना हुंडा द्यावा लागतो, १२ वीच्या पुस्तकातील विधानामुळे वाद

हुंडा ही एक वाईट प्रथा आहे. तो का घेतात याचे कारण आपणास माहित आहे का? नाही ना. परंतु महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या पुस्तकात याचे कारण देण्यात आले आहे. या कारणामुळे वाद निर्माण झाला असून अनेक स्वयंसेवी संघटनांनी या पुस्तकांवर टीका केली आहे. कुरुपतेमुळे किंवा मुलगी दिव्यांग असेल तर त्यांना हुंडा द्यावा लागतो असे कारण महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या १२ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात आहे. १२ वीच्या पुस्तकात देशातील प्रमुख सामाजिक समस्या असे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणात मुलगी कुरूप असेल तर हुंडा द्यावा लागतो असे म्हटले आहे. हुंडा का दिला जातो किंवा घेतला जातो हे अनेक घटकांवर अवलंबून असून त्यापैकी हे देखील एक कारण असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.

जर मुलगी कुरूप असेल किंवा दिव्यांग असेल तर तिचे लग्न जमवणे खूप कठीण होऊन जाते. तिचे लग्न जमविण्यासाठी तिच्या घरची मंडळी मुलाला खूप सारा हुंडा देऊ करतात. त्यातून हुंड्यासारख्या प्रथांना प्रोत्साहन मिळते असे या पुस्तकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मंडळाला याबाबत विचारणा केली असता आपण या प्रश्नाकडे लक्ष देऊ असे आश्वासन मिळाले आहे. बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर मामने यांनी आपण याकडे लक्ष देऊ असे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल त्यानंतर मी यावर भाष्य करेन असे मामने यांनी म्हटले.

 दरम्यान, आपल्या समाजात अद्यापही ज्या वाईट चालिरीती सुरू आहेत त्यामध्ये हुंडा हा देखील एक अत्यंत बिकट प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात हुंड्यासाठी वरदक्षिणा असा शब्दप्रयोग केला जात असे. हुंड्यामुळे आतापर्यंत देशात हजारो बळी या हुंड्यामुळे गेले आहेत. नॅशनल क्राइम ब्युरो रेकॉर्डनुसार २०१२ या वर्षात हुंड्यामुळे १८,००० महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *