पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या घरगुती वायुवरील (एलपीजी) अनुदान आर्थिक सुबत्ता असलेल्या नागरिकांनी घेऊ नये, असे आवाहन केले होते. परंतू आतापर्यंत केवळ 0.35 टक्के लोकांनीच एलपीजी अनुदानाचा त्याग केला आहे.
आतापर्यंत 15.3 कोटी एलपीजी धारकांपैकी फक्त 5.5 लाख लोकांनी एलपीजी अनुदानाचा त्याग केला, असे गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. या बैठकीला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
एलपीजी अनुदान आर्थिक सुबत्ता असलेल्या नागरिकांनी घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या मार्चपासून करत आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला सार्वजनिक क्षेत्रातील कामगार, खासदार आणि शासकीय कर्मचारी यांचा थंड प्रतिसाद मिळाला आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाबरोबरच विविध पक्षांच्या खासदार आणि आमदारांनी अजूनही एलपीजी अनुदान सोडलेले नाही.

