भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केला. त्याचवेळी भाजप सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथील आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते.
मोदी पुढे म्हणालेत, भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकदार बिंदू बनला आहे. आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा सर्वात मोठा ब्रँड बनेल. यावेळी मोदी यांनी जपान आणि कॅनडा या देशांसह व्हायब्रंट गुजरात परिषदेतील सहभागी देशांचे आणि संस्थांचे आभार मानले.
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मभूमी असणारा गुजरात भारताच्या उद्यमशीलतेचे प्रतिक आहे. लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. काही लोकांना लोकशाही व्यवस्था प्रभावी आणि गतिमान नसल्याचे वाटते. मात्र, लोकशाहीतही जलद गतीने निकाल पाहायला मिळतात, हे गेल्या अडीच वर्षात दिसून आल्याचे मोदींनी सांगितले.