ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पवार कुटुंबियांविरुद्ध असहकार पुकारले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात दोन दिवाणी आणि एक फौजदारी याचिका दाखल केली आहे. बँकांकडून आर्थिक सहाय्य घेऊनही साखर कारखाने जाणीवपूर्वक डबघाईला आणण्यात आले आणि त्यानंतर ते कमी किंमतीमध्ये विकण्यात आले. या सर्व अनागोंदी कारभारामुळे राज्य सरकार, सहकार क्षेत्र आणि जनतेचे २५ हजार कोटींचे नुकसान झाले असा दावा अण्णा हजारेंनी केला आहे. सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही हजारेंनी याचिकेत केला आहे. या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी अण्णा हजारेंनी केली असून याचिकेत शरद पवार आणि अजित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. घोटाळ्याची सीबीाय चौकशी करण्याची अण्णा हजारेंची मागणी आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन या प्रकरणातील आकडेवारी मिळवल्याचे अण्णा हजारेंनी याचिकेत म्हटले आहे.
हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन
अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये साखर कारखान्याला परवानगी देताना राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या २००६ मधील आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. जुलै २००६ मध्ये मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला नवीन साखर कारखान्याला परवानगी देऊ नये असे आदेश दिले होते. पण सरकारने २००६ ते २०१४ या कालावधीत ५८ नवीन कारखान्यांना परवानगी दिली असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.
कारखान्यांची बेकायदा विक्री
साखर कारखाने हे राज्यातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण या कारखान्यांना जाणीवपूर्वक डबघाईला नेण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेकडून या कारखान्याला मदत मिळाली आणि त्यामुळे बँकाची अवस्थाही बिकट झाली. यानंतर डबघाईला आलेल्या कारखान्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आली. अशा प्रकारे सुमारे ४७ कारखान्यांची बेकायदेशीरपणे विक्री झाली असा हजारेंचा आरोप आहे.
घोटाळ्याचे पवार कनेक्शन
शरद पवार २००४ ते २०१४ या कालावधीत केंद्रीय कृषीमंत्री तर अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. पवार हे महाबँकेत संचालक पदावर असतानाच विक्रीचा घोटाळा झाला. सत्तेचा गैरवापर करुन सरकारचे मोठे नुकसान करण्यात आले. पवारांविरोधात परिस्थितीजन्य पुरावे असून याची चौकशी होण्याची गरज असल्याचे हजारे म्हणालेत.