ठाण्याच्या पातलीपाडा भागात मातीचा ढिगारा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. हे मजूर जेवण करून कामाच्या ठिकाणी परतत होते. या घटनेनंतर बेजबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पातलीपाडा भागातील हिरानंदानी इस्टेटच्या मागच्या बाजूला टीसीएस कंपनीचे काम सुरू असून या बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्डय़ातून निघालेली माती वरच्या बाजूला टाकण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी अडीजच्या सुमारास मोहम्मद अबुल हुसेन (३४) आणि राधाकांत बाराभोये (३२) हे दोन मजूर जेवण आटोपून खड्डय़ाच्या आत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी वरून उतरत होते. यावेळी अचानक त्यांच्यावर वरून मातीचा ढिगारा कोसळला आणि ते त्याखाली गाडले गेले. यावेळी खालच्या बाजूला काम करत असलेल्या ७ मजुरांनी पळ काढल्याने ते बचावले.
याबाबत माहिती मिळताच ठाणे पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर या दोनही मजुरांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
यावेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे हे स्वत: उपस्थित होते. ढिगा-याखाली आणखी एक मजूर अडकल्याचे बोलले जात होते, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही मजूर न सापडल्याने ७ वाजता शोधकार्य थांबवण्यात आले.
दरम्यान, पहिल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, हे पाहण्यासाठी इतर मजुरांनी मोठी गर्दी केली. मात्र मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून रुग्णवाहिका निघाल्याने हे मजूर आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत वातावरण शांत केले.