मुंबईतील पवईच्या तलावात बोट उलटून आठ जण पाण्यात बुडाले. शुक्रवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. बोटीतील प्रवासी पार्टी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. यातील पाच जण वाचले असून तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
रात्री साडेदहाच्या दरम्यान ही हाऊस बोट पवई तलावात उलटली. बोटीतील आठही जण पाण्यात बुडाले. त्यापैकी दोघांना स्थानिकांनी वाचवले. तर तिघे स्वत: पोहत वर आले. बुडालेले तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरु आहे.
ही हाऊसबोट एका रॉडला अडकून उलटली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हाऊसबोटीवर पवई तलावात बंदी असतानाही ही बोट कशी काय वापरली जात होती, याचा शोध सुरु आहे. तसेच या पार्टीला परवानगी कोणी दिली याचीही चौकशी सुरु आहे.