आश्चर्य ! 40 वर्षांपुर्वी अंत्यविधी करुनही ‘ती’ जिवंतच

एखाद्या बॉलिवूड चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना कानपूरमध्ये घडली आहे. 40 वर्षापुर्वी मृत पावली म्हणून अंत्यविधी करण्यात आलेली महिला पुन्हा आपल्या घरी परतली आहे. 82 वर्षांच्या या आजींचा 1976 मध्ये साप चावल्याने मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यविधी करत तिचा मृतदेह गंगा नदीत सोडून दिला होता. बिधनू गावात ही आश्चर्यकारक घटना घडली आहे.
तब्बल 40 वर्षांनंतर ही महिला पुन्हा आपल्या घरी परतली असून नेमकं काय झालं होतं याची माहिती दिली. ‘खरं तर साप चावल्याने माझा मृत्यू झाला नव्हता. मी फक्त बेशुद्ध झाली होती. काही मच्छिमारांनी मला वाचवलं आणि त्यांच्या गावातील मंदिरात नेलं’, असं त्यांनी सांगितलं आहे.
82 वर्षीय विलासा शेतामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कोब्रा साप त्यांना चावला होता. जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा कुटुंबियांनी त्यांना गावातील वैद्याकडे नेलं. पण त्याने काहीच फायदा झाला नाही, ज्यामुळे विलासा यांचा मृत्यू झाल्याचा समज झाला. यानंतर कुटुंबियांनी त्यांच्यांवर अंत्यविधी करत मृतदेह गंगा नदीत सोडून दिला. पाण्यामध्ये वाहत विलासा जवळच्या कन्नौज गावात पोहोचल्या. तेथील स्थानिकांनी त्यांना मदत करत आश्रय दिला.
विलासा यांच्या मुली राम कुमारी आणि मुन्नी यांना तर आपल्या डोळ्यासमोर आपली आई उभी आहे यावर विश्वासच बसत नव्हता. ‘माझ्या आईला काहीच आठवत नव्हतं. काही दिवसांपुर्वी तिने एक घटना एका मुलीशी शेअर केली. तिने आपल्या काकांना याबद्दल सांगितलं. त्यानंतर आईच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली, आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. जन्मखूण पाहताच ही आमचीच आई असल्याची खात्री पटल्याचं’, राम कुमारीने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *