ग्राहकांना दिलासा मिळणार?, फेब्रुवारीत एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढण्याची शक्यता

नोटाबंदीचा निर्णय होऊन आज ४५ दिवस झाले आहेत. परंतु अजूनही देशातील चलन तुटवड्याची समस्या कमी झालेली नाही. बँका व एटीएमसमोरील रांगा कमी होताना दिसत नाहीत. या रांगा जानेवारी महिन्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या एटीएममधून दररोज २५०० रूपये काढण्याची मर्यादा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालानुसार ही मर्यादा जानेवारी महिन्यातही कायम राहू शकते.
नोटा छपाई करण्याचे व बँकांना पैसे देण्याचे काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या मागील सहा महिन्यांच्या माहितीचा अभ्यास करून लोकांना दर महिन्याला किती रोख पैशांची आवश्यकता असते याचा अभ्यास एसबीआयने केला आहे.
या आकडेवारीनुसार एक व्यक्ती एका एटीएममधून साधारणपणे महिन्याला ३१४३ रूपये काढतो. म्हणजे दररोज १०३ रूपये होतात. देशात सध्या ७७ कोटी एटीएम कार्ड आहेत. म्हणजे रोज देशभरातील एटीएममध्ये सुमारे ८००० कोटी रूपयांची गरज आहे. इतकी रक्कम असेल तेव्हाच एटीएमबाहेर रांगा लागणार नाहीत.

सध्या देशात २ लाख १६ हजार २१६ एटीएम आहेत. म्हणजे प्रत्येक एटीएममध्ये रोज ३ लाख ७० हजार रूपयांची आवश्यकता असते. जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजाराची मर्यादा हटवणार नसल्याचा एसबीआयचा अंदाज आहे.
देशभरातील चार करन्सी प्रेसमधून दर महिन्याला ५०० रूपयांच्या २८६ कोटी नोटा छापल्या जातात. म्हणजे एकूण १ लाख ४३ हजार कोटी मूल्यांच्या ५०० च्या नोटा प्रत्येक महिन्याला छापल्या जातात. परंतु एसबीआयच्या मते एटीएममध्ये पुरेसे पैसे उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक महिन्याला २ लाख ४० हजार कोटी रूपयांची गरज आहे. म्हणजे सध्या १ लाख कोटींची कमतरता आहे.
हा चलन तुटवडा दूर करण्यासाठी व्यवहारात कमीत कमी ७५ टक्के रकक्म आणावे लागतील. त्याचबरोबर नवी रक्कम जे लोक बँकांतून काढत आहेत. त्याही जमा केल्या तर एटीएममधील रांगा संपूर्णपणे संपुष्टात येईल आणि लोकांना हवी तितकी रक्कम काढता येईल. नोटाबंदीनंतर बाहेर गेलेले १५.४४ लाख हजार कोटींचे ७५ टक्के ११.५८ लाख इतके होतात. मार्च महिन्यापर्यंत ही रक्कम बाजारात येईल. म्हणजेच एटीएमच्या बाहेरील रांगा कमी होण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यासाठी किमान फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *