आठ नोव्हेंबरनंतर ज्यांच्या खात्यामध्ये 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. सध्या बँक लॉकर, बडया आसामींविरोधात छापेमारीची कारवाई सुरु आहे. पुढच्या टप्प्यात 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा हिशोब न देऊ शकणा-या खातेधारकांवर कारवाई होऊ शकते.
आरबीआयने बँकांकडून संशयास्पद व्यवहार झालेल्या खात्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती आयकर खात्याला दिली जाऊ शकते. सध्या बँका खात्यातून होणा-या संशयास्पद व्यवहारांची आर्थिक गुप्तचर शाखेला माहिती दिली जात आहे. त्या आधारावर छापेमारीची कारवाई सुरु आहे.
पुढच्या टप्प्यात काळापैसा धारकांसाठी आपल्या बँक खात्याचा वापर करणारे अडचणीत येऊ शकतात. बँकिंग व्यवस्थेचा काळा पैसा सफेद करण्यासाठी उपयोग होऊ नये असा आरबीआयचा उद्देश आहे. 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर 15 लाख कोटींच्या आसपास चलन बाद झाले त्यातील 12.44 लाख कोटी रुपये आतापर्यंत बँकांमध्ये जमा झाले आहेत.