‘सकाळी भरपेट नाश्ता करा, दुपारी थोडं कमी जेवा आणि रात्री खूपच हलके फुलके खा!’ असा सल्ला नेहमीच दिला जातो. तो पाळणेही तितकेच गरजेचे आहे. रात्री खाल्यानंतर एक दोन तासातच आपण झोपी जातो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते अशावेळी फारच कमी खाणे किंवा हलके फुलके खाणे फायद्याचे ठरेल. अनेक पदार्थ हे पचायला जड असतात त्यामुळे रात्री शक्यतो कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. तेव्हा रात्री जेवताना काही पदार्थ खाणे हे आवर्जून टाळले पाहिजे.
हे पदार्थ रात्री खाणे टाळा
भात : भात हा पचायला जड असतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी तो न खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्री भात खाल्ल्याने पोटाकडील चरबी वाढते.
मांसाहारी पदार्थ : रात्रीच्या वेळी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. कारण, मांस पचायला २४ ते ७२ तासांचा कालावधी लागतो. यामुळे वजन तर वाढतेच पण रात्री अपचनामुळे झोपमोडही होऊ शकते. तेव्हा मांसाहार करणे टाळा.
चायनिज पदार्थ : हॉटेल किंवा चायनिजच्या गाड्यांवर मिळणारे चायनिज पदार्थ अनेकांच्या आवडीचे झाले आहे. एकटे राहणा-यांचा किंवा कामावरुन उशीरा सुटणा-यां लोकांचे चायनिज पदार्थांना प्राधान्य असते. ऑर्डर केल्यावर हे पदार्थ पटकन पुढ्यात येतात. पण रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाणे महागात पडू शकते. या पदार्थांमध्ये एमएसजी असते. आरोग्याच्या दृष्टीने तो घातक असतोच पण त्यामुळे निद्रानाशही होऊ शकतो.
फास्ट फूड / तेलकट पदार्थ : पिझ्झा, बर्गर, फ्राईज यासारखे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळा. अपचन किंवा अॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो.
चॉकलेट : चॉकलेट हे कितीही आवडीचे असले तरी झोपण्यापूर्वी ते खाऊ नका. कारण चॉकलेट्समधेही काही प्रमाणात कॅफेन असते. तेव्हा रात्रीच्या वेळी चॉकलेटच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.