सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व चित्रपटगृहांना राष्ट्रगीत दाखवणे बंधनकारक केले आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी पडद्यावर तिरंगा दाखवून राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर चित्रपटगृहात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले पाहिजे असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
सध्या लोकांना राष्ट्रगीत कसे गायचे हे ठाऊक नाही. लोकांना शिकवण्याची गरज आहे. आपण राष्ट्रगीताचा आदर केलाच पाहिले असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य होते पण आता देशभरात राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील काही सिनेमागृहात राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर सन्मानार्थ काही जण उभे न राहिल्याने वादाच्या घटनाही घडल्या होत्या. राष्ट्रगीताचा व्यावसायिक गैरवापर होऊ नये यासाठी टीव्हीवरील मनोरंजन कार्यक्रमात राष्ट्रगीत गायनाला मनाई करण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या मुख्यसचिवांना संबंधित आदेशाचे परिपत्रक दिले जाईल तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियामधून माहिती प्रसिद्ध केली जाईल असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
