ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ साहित्यिक ‘झोंबी’कार आनंद यादव यांचे सोमवारी रात्री उशिरा पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारता आले नव्हते. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली होती.

३० नोव्हेंबर  १९३५ रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जन्म झाला होता. आनंद यादव यांनी कोल्हापूर व पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीत त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकरं (दी‍र्घकविता) हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता.

खळाळ, घरजावई, माळावरची मैना, आदिताल, डवरणी (पुस्तक), उखडलेली झाडे ही कथासंग्रह. मातीखालची माती हे व्यक्तीसंग्रह प्रसिद्ध झाले होते. तर स्पर्शकमळे, पाणभवरे, १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाहआत्मचरित्र मीमांसा मराठी लघुनिबंधाचा इतिहास, साहित्य आणि वास्तव ग्रामीण साहित्य, स्वरूप व समस्या, मराठी साहित्य समाज आणि संस्कृती आदी ललित व वैचारिक लेख संग्रह लिहिले. गोतावळा, नटरंग, एकलकोंडा, माऊली, संतसूर्य तुकाराम ही कादंबरी लिहिली. नटरंग या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला होता. झोंबी, नांगरणी, घरभिंती व काचवेल हे आत्मचरित्रात्मक पुस्तक ही लिहिले. त्याचबरोबर उगवती मने ही बालकथाही प्रसिद्ध झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *