बॉलिवुडचे दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा ‘आशिर्वाद’ बंगला पाडून त्याजागी टोलेजंग इमारत बांधण्यात येणार असल्याचे समजते. राजेश खन्ना यांचा हा बंगला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मंगलोर येथील उद्योगपती शशि किरण शेट्टी यांनी खरेदी केला होता.
शेट्टी हा ६,५०० स्क्वेअर फुट परिसरात असलेला बंगला पाडून तीन ते चार मजल्यांची इमारत बांधणार आहेत. शेट्टी हे ऑलकार्गो लॉजिस्टिकचे संचालक आहेत. आशिर्वाद हा बंगला सुमारे ५० वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तो पाडून इमारत बांधण्यात येणार आहे. पुढील काही महिन्यांतच इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
हा बंगला पाडून तिथे नवीन इमारत बांधण्यात येणार असली तरी तिचे नाव आशिर्वादच ठेवण्यात येणार आहे,असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. या नवीन इमारत बांधल्यानंतर गृहप्रवेशासाठी किमान अजून १८ महिने लागणार आहेत, असंही ते म्हणाले.

